अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात ग्रामिण जनता गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे चित्र असताना आता पुन्हा तालुक्यातील एकूण ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तब्बल ४६ ग्रामपंचायतीवर भाजपाच्या शिलेदारांनी यशाचा झेंडा रोवल्याने भाजपाची ताकद अबाधित असल्याचे दिसून आले. यानिमित्ताने माजी आमदार स्मिता वाघ यांचे नेतृत्व सिद्ध झाले असल्याचा दावा भाजपाचे अमळनेर तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी केला आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर काल सकाळपासून अनेक गावांच्या विजयी उमेदवारांची माजी आमदार स्मिता वाघ यांच्या कार्यालयात भेट देण्यासाठी रीघ लागली होती. तालुक्यात एकूण ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यापैकी १४ ग्रामपंचायत या आधीच बिनविरोध झाल्या होत्या. संपूर्ण तालुक्यातील गावात निवडणुका अत्यंत चुरशीने मात्र खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात नशीब आजमावुन जोरदारपणे लढत दिली. अखेर मतदारांनी भाजपाच्या शिलेदारांना विजयाचे आशीर्वाद दिल्याने एकूण ४६ ग्रामपंचायतीवर १०० टक्के भाजपाचे वर्चस्व राहील असे संकेत मिळाले आहेत. स्वर्गीय उदय वाघ यांच्या नंतरही तालुक्यात भाजपाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची संपूर्ण टीम कार्यरत झाली होती. अखेर आमची रणनीती यशस्वी ठरली असून शिरूड, सात्री, प्रगणे डांगरी, पातोंडा, एकलहरे इत्यादी चुरशीची निवडणूक झालेल्या गावांत भाजपने उल्लेखनीय यश मिळविले आहे. दुर्दैवाने या निवडणुकीत काही गावात भाजपाच्या कार्यकर्त्यांचा पराभव झाला आहे. त्याचे चिंतन जरूर होईल परंतु तालुक्यात भाजपाने या ग्रामपंचायत निवडणूकित मिळविलेले यश आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांसाठी प्रेरणादायीच राहील. भाजपाच्या भविष्यातील जोरदार यशासाठी हे शुभ संकेतच राहणार आहेत अशी माहिती हिरालाल पाटील यांनी दिली.
दरम्यान भाजप कार्यालयात भेटीसाठी आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार स्मिता वाघ व भाजपाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींनी केला. यावेळी स्मिता वाघ यांनी सम्बधित गावात केंद्र शासन तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.