जामनेर (प्रतिनिधी) शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र फक्त देखाव्यासाठी सुरू केलंय. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. जामनेर बाजार समितीच्या आवारात शेतकरी सहकारी संघाच्यावतीने आज शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आ. महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार महाजन म्हणाले, की शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र फक्त देखाव्यासाठी सुरू केले आहे. या केंद्रात मका १ हजार ८५० तर ज्वारी २ हजार ६२० प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. राज्य सरकार सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांबाबत उदासीन असुन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात पार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला.