मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दूपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.
रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय अशी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नसल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या. राज्यभर चर्चा असलेल्या पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे वादात अडकलेले वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोडांनी २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आपला राजीनामा सोपवला होता. २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नसल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या. यानंतर आज उद्धव ठाकरेंनी राठोडांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर राज्यपालांकडे पोहचलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तर, विदर्भातील शिवसेना नेते संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्रिपद गमवावे लागल्यावर त्यांच्या जागी या भागातून कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
राजीनामा दिल्यानंतर काय म्हणालेत संजय राठोड ?
संजय राठोड यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. याविषयावर बोलताना राठोड म्हणाले होते की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न विरोधीपक्षाकडून केला जात आहे. घाणेरडे राजकारण सुरू आहे. माझ्यावर आरोप लावले जात आहे. पण चौकशी सुरू आहे, या चौकशीमध्ये सर्व सत्य समोर येईल. चौकशी निपक्षपणे व्हायला हवी ‘ असे संजय राठोड म्हणाले आहेत.