अहमदनगर (वृत्तसंस्था) श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे घरगुती वादातून माथेफिरू पतीने अत्यंत क्रुरतेने पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. निर्मला शांताराम देसाई (४२) असे मयत महिलेचे, तर शांताराम खंडेराव देसाई (४५) असे आरोपी पतीचे नाव आहे.
या संदर्भात स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, नाऊर येथील देसाई कुटुंब एकमेव स्वतंत्र वस्तीत राहत होते, गेल्या अनेक वर्षापासून पती-पत्नीमध्ये काही ना काही कारणाने वाद होत होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून दोघेही विवाहित आहेत. मुलगा पुणे, तर मुलगी अकोले येथे राहते. पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. दोन दिवसापूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नी निर्मला ही नायगाव येथे राहत असलेले आरोपी शांताराम याचे मोठे भाऊ वसंत देसाई यांच्या वस्तीवर गेली होती.
शांताराम याला दोन दिवसापासून जेवणासाठी काहीही मिळत नसल्याने तो रागात सकाळी नायगाव येथील त्याच्या भावाच्या वस्तीवर गेला व पत्नी निर्मला हिला घरी चल नाहीतर पाहून घेईल, असे बोलला. अखेर दोघे पती-पत्नीत परत बाद होणार नाहीत, अशा शब्दावर मयत निर्मला ही आपल्या नाऊर येथील राहत्या घरी परतली. मात्र त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. शांताराम याने पत्नी निर्मलाचे पाय घरातील बाजीला साखळीच्या सहाय्याने बांधून तिला लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच झालेल्या जखमांवर मीठ चोळले. त्यानंतर कपड्याच्या सहाय्याने गळा आवळून जीवे ठार मारले.
यावेळी फिर्यादी जयश्री देसाई व नातेवाईक मदतीला धावले असता त्यांनाही दमदाटी करण्यात आली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान, आरोपीने खून करताना क्रूरतेचा कळस गाठला असून त्याने पत्नीला अतिशय निर्दयीपणे जिवंत ठार मारले. तिच्या जखमांवर मीठ टाकून क्रूरतेचा कळस गाठला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.