जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानातल्या बुंदी जिल्ह्यात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा एका दलित नवरदेवाची घोड्यावरून निघालेली वरात सध्या चर्चेला विषय बनली आहे. कारण राजस्थानात दलित नवरदेवांना घोड्यावरून वरात काढता येत नव्हती.
राजस्थानातल्या बुंदी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जय यादव यांच्या देखरेखीखाली मोठ्या कडक पोलीस बंदोबस्तात २७ वर्षीय नवरदेव श्रीराम मेघवाल याच्या लग्नाची वरात निघाली. ही वरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे याचं कारण म्हणजे हा नवरदेव दलित समाजातला आहे. मेघवाल आणि त्यांची होणारी पत्नी द्रौपदी यांचं लग्न काल म्हणजे सोमवारी बुंदी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं करण्यात आलं. दरम्यान, राजस्थानात दलित नवरदेवांना घोड्यावरून वरात काढता येत नाही. त्यामुळे अशाच घटना रोखण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने बुंदी जिल्ह्यातल्या ३० गावांची निवड केली आणि या गावांमध्ये ‘ऑपरेशन समानता’ राबवलं जात आहे. या मोहिमेअंतर्गत या दलित नवरदेवाची घोड्यावर बसून गावातून मिरवणूक काढण्यात आली. पोलीस अधीक्षक जय यादव यांनी स्वतः अधिकारी आणि समाजातल्या प्रमुख लोकांसमवेत या वरातीचं स्वागत केलं.
या वरातीदरम्यान ‘जय भीम’च्या घोषणा देणारी गाणी वाजवण्यात आली. नवरदेव श्रीराम मेघवालने सांगितलं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्याची घोड्यावरून वरात निघाली आहे असा मी पहिलाच दलित नवरदेव आहे. ही एका नव्या बदलाची नांदी आहे. दलितांना कायम ‘खालच्या’ दर्जाचे समजणाऱ्या मानसिकतेला बदलण्यासाठी आणि समानतेच्या दिशेने हे एक चांगलं पाऊल आहे. दरम्यान, देशात अजूनही जातीयवाद कशा पद्धतीने दलितांचे सामान्य हक्क हिरावून घेतो, हे राजस्थान मधील परिस्थितीवरून लक्षात येते.