मुंबई (वृत्तसंस्था) ‘राज्यात गणेश मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानग्या आता पाच वर्षांत एकदाच घ्याव्या लागतील. त्या एक खिडकी योजनेंतर्गत देण्यात येत येतील,’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. पोलिस आयुक्तालयात आयोजित गणेशोत्सव पदाधिकारी बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘महापालिकेचे मंडप शुल्कही माफ करण्यात आले आहे. मंडप शुल्क माफ करणे, वीज मीटर परवानगी देणे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळांना सहकार्य करावे. गणेश मंडळे तसेच भाविकांना जल्लोष करण्यासाठी पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करताना नियमांचे पालन करावे. विसर्जन मिरवणुकीत दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेनंतर मंडळांना पारंपरिक वाद्ये वाजवू द्यावीत, पोलिसांनी कारवाई करू नये. उत्सवात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी, तर वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी.