अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षकी पेशा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षकी पेशातून कार्य करतांना स्पर्धा परीक्षा केंद्राचे एक मोठे काम उभे राहू शकले, असे ढेबूजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालय येथे सत्कार मार्गदर्शन करतांना सानेगुरुजी वाचनालय स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार बोलत होते.
शिक्षकी पेशा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षकाने प्रामाणिक कार्य केले की त्याचे फळ मिळते. आज पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्यावतीने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केल्यामुळे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाले. याचा मनस्वी आनंद आहे. स्पर्धा परीक्षेचे नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आज अनेक उच्चपदस्थ अधिकारी सानेगुरुजी वाचनालयाला भेट देतात तेव्हा अभिमानाने छाती फुलून जाते. अनेक मैत्रीचा गोतावळा वाढला. दर महिन्याला खिशातून तीन हजार रुपये टाकून स्पर्धा परीक्षेतील केंद्र चालवण्याचा जो आनंद मला मिळतो तो दुसरा कोणताच मोठा आनंद माझ्यासाठी नसेल! मी श्रीमंत नसलो तरी माझ्या मनाची श्रीमंती खूपच मोठी आहे. शिक्षकी पेशातून कार्य करतांना स्पर्धा परीक्षा केंद्राचे एक मोठे काम उभे राहू शकले. आज ढेबूजी झिंगराजी जाणोरकर वाचनालयाचे अध्यक्ष दीपक वाल्हे यांनी शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुणगौरव केला. त्यांचा मनस्वी अभिनंदन करतो, असे शिक्षक सत्कार मार्गदर्शन करतांना सानेगुरुजी वाचनालय स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार बोलत होते.
व्यासपीठावर प्राध्यापक डॉ. रमेश माने, प्रकाश वाघ, नरेंद्र महाजन, किशोर महाले, अमृत जाधव, उमेश वाल्हे, अविनाश जाधव होते. अगोदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. अगोदर कार्यक्रमात कार्यक्रमाचे आयोजक व अध्यक्ष दीपक वाल्हे त्यांच्या वाचनालयाचे सर्व संचालक मंडळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
जाधव क्लासेसचे संचालक विनोद जाधव यांनी सांगितले की, सामाजिक कार्यकर्त्यांना जातीच्या बंधनातून मुक्त केले पाहीजे. थोर समाजसुधारक हे फक्त एका जातीचे नसून संपूर्ण देशासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मला अनेकांनी जात विचारण्याचा प्रयत्न केला. पण मी सांगितले कि ‘शिक्षक ही माझी जात आहे, तर विद्यार्थी हा माझा धर्म आहे’.
पुढे ते म्हणाले की, संत गाडगे महाराज यांनी संपूर्ण देशात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी फक्त एका समाजासाठी काम नाही केले तर त्यांनी संपूर्ण देशासाठी काम केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षक होते पण शिक्षक देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले म्हणून आजच्या पिढीने आपण काय होऊ शकतो? याचा विचार करून खूप मेहनत, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असली तर आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत नाही हेही त्यांनी सांगितले. सानेगुरुजी वाचनालयात एक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. एक छोटासा व्यवसाय करणारा दीपक वाल्हे हा सर्व स्तरातील शिक्षकांचा गुणगौरव करतो हे समाजाच्या दृष्टिकोनातून भूषणावह आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रा.डॉ रमेश माने त्यांनी सांगितले की, शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा गुणगौरव करणे यासाठी मोठे मन लागते. सध्याच्या परिस्थितीत माणूस भ्रमणध्वनीच्या माध्यमातून माणुसकी विसरत चालला आहे. माणसं दूर होत चाललेले आहेत. वाचन संस्कृती कमी होतांना आपल्याला दिसत आहे. बराच वेळ आजच्या पिढीचा भ्रमणध्वनीत वाया जातांना दिसत आहे. कोरोना परिस्थितीत सध्याचे शिक्षण ऑनलाइन असल्यामुळे विद्यार्थी भ्रमणध्वनीचा जास्त वापर करतांना दिसत आहे. कोणत्याही वस्तूचा योग्य वापर असेल तरच जीवनात आपण अमुलाग्र बदल करू शकतो. अतिवापरामुळे तरुणपिढी माणुसकी विसरत चालला आहे. प्राप्त परिस्थितीत वेळेचे व आर्थिक व्यवस्थापन योग्य केले तर जीवनाचे व्यवस्थापन बिघडत नाही. आपण त्या परिस्थितीतून दुसर्याला आनंद देऊ शकतो, असे प्रा. डॉ. रमेश माने यांनी गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना सांगितले.
ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक गुलाबराव जाधव यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक शिक्षक होते. शिक्षक काय होऊ शकतो याची उदाहरणे आपल्या देशात डोळ्यासमोर आहेत .आजही समाजात शिक्षकांकडे आदराने पाहिले जाते म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देऊन त्यांच्या स्पर्धा परीक्षा वर भर द्यावा, असे सांगितले. संत गाडगे महाराज व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
तसेच अध्यक्षीय भाषणात सानेगुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी सांगितले की, शिक्षकांबद्दल आदर खूपच आहे. पण सध्या भीती कमी झालेली आहे. त्याला अनेक कारणे असू शकतात पण पालकांपेक्षा शिक्षकच पाल्यांना योग्य घडवू शकतात व अनेक विद्यार्थी घडवले आहेत, म्हणून मला गुरुजन विषय सतत आदर आहे. सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शिक्षकांची कामे वाढलेली आहेत कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षकांनी अनेक अशैक्षणिक कामे केली. शिक्षकच प्रामाणिकपणे काम करू शकतो. हे तेवढेच सत्य आहे. आज सानेगुरुजी वाचनालयात दीपक कोल्हे आमच्या वाचनालयाचे संचालक यांनी शिक्षकांचा गुणगौरव केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
विजय वाघ, प्रा रमेश माने, प्रा अनिल वाल्हे, प्रा विजयसिंग पवार, विनोद जाधव, गुलाबराव जाधव, बापू नगांवकर, जगतराव निकुंभ, सौ.दिपाली जाधव, सौ.जयश्री जाधव, ईश्वर महाजन ,पी एन भादलीकर, प्रा मुकेश वाल्हे, नरहरी बोरसे, अशोक येशी, अँड. रामकृष्ण उपासनी, प्रसाद जोशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा परिट धोबी मंडळ अमळनेर व पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथील सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक दीपक वाल्हे केले.
















