चंद्रपूर (वृत्तसंस्था) मराठवाडा आणि विदर्भात तर सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अशात विदर्भातील चंद्रपूर शहराचा जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश झाला असून मंगळवारी येथील तापमानाचा पारा 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.
मंगळवारी नोंदलेल्या तापमानानुसार, चंद्रपूर हे शहर तिसऱ्या क्रमांकाचं जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं आहे. काल सकाळपासूनच चंद्रपुरात उन्हाचा चटका वाढला होता. रात्री देखील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी मालीतील कायेस (Kayes) शहर हे पृथ्वीतलावरील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं आहे. या ठिकाणी तापमानाचा पारा 44.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यापाठोपाठ सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत मालीतील सेगोऊ शहराचा दुसरा क्रमांक लागला आहे. येथील तापमान 43.8 अंश इतकं नोंदलं आहे. त्यानंतर भारतातील चंद्रपूर पृथ्वीतलावरील तिसरं सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. मंगळवारी येथील तापमानाचा पारा 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.
पहिल्या दहामध्ये भारतातील 4 शहरं
एवढंच नव्हे तर, सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील चार शहरांचा समावेश आहे. या यादीत विदर्भातील अकोला हे शहर सातव्या क्रमांकावर असून मंगळवारी येथील तापमान 43.1 अंश सेल्सिअस एवढं नोंदलं आहे. तर भारतातील पिलानी आणि चुरू ही शहरं अनुक्रमे 43.1 अंश सेल्सिअस आणि 43.0 अंश सेल्सिअससह आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत.