कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी) उधारीवर घेतलेल्या कापसाचे पैसे १७ वर्षांनी देण्याचे काम बोरनार (ता. जळगाव) या गावातील हा व्यापारी करीत आहे. बुडालेले, तसेच विसर पडलेले पैसे अचानक मिळाल्याने या व्यापाऱ्याच्या प्रामाणिकपणाची घराघरात चर्चा होत आहे. १७ वर्षात कोणता शेतकरी वारला आहे, त्याच्या वारसाला, कुणाजवळ देखील या व्यवहारातील कोणताही पुरावा नाही. पण त्यावेळच्या चिठ्ठया बरोबर सांभाळून ठेवल्याने घरोघर जाऊन पैसे वाटणारा हा इसम कदाचित विरळाच आहे.
बोरनार हे जळगाव तालुक्यातील लहानसे गाव, इथे राहणाऱ्या अब्दूल सलीम अब्दूल खालीक देशमुख या प्रामाणिक व्यापाराची ही कहाणी. आधी किराणा दुकान नंतर कापसाचा व्यापार त्याने सुरु केला. हळू हळू जम बसला, विश्वासामुळे उधारीवर मोठ्या प्रमाणात कापूस मिळू लागला. सन २००५ मध्ये त्यांचे ग्रह फिरले. म्हसावद, बोरनार, दहिगाव, डोकलखेडे वरसाडे माहिजीसह परिसरातील २५.३० खेड्यातील सुमारे तीन ट्रक म्हणजे ३०० क्विंटलच्या पुढे माल खरेदी केला. पण एकाही शेतकऱ्याचे ते पैसे देऊ शकले नाही. शेतकरी दररोज पैसे मागायला येत, पण व्यापारात मोठा घाटा आल्याने पैसे देता येत नव्हते. वर्षे दोन वर्ष उलटले, वर्षभराच्या कमाईचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी देखील हवालदिल झाले. वायदा मिळत होता, पण पैसे मिळत नव्हते. शेवटी पैसे बुडाले, असे समजून शेतकऱ्यांनीही त्याचा नाद सोडला.
सलीमला सलाम
एक-दोन नव्हे तब्बल सतरा वर्ष झाल्यानंतर देशमुख यांच्या शेती विकून पैसा आला. (शेतीची कोर्टात केस असल्याने निकाल आल्यानंतर पैसा आला.) पैसा मिळताबरोबर या व्यापाऱ्याने सन २००५ मध्ये उधारीवर व तोंडी घेतलेल्या कापसाच्या चिटोऱ्या काढल्या, ज्याचा जेवढा भाव होता तेवढे पैसे चेक द्वारे घरी जाऊन ते सध्या देत आहेत. म्हसावद दहीगाव परिसरात हे पैसे परत करण्याचे काम सध्या करीत आहेत. उद्ध्वस्त माळरानावर अचानक वसंत बहरावा. अशा या घटनेने ज्यांचे पैसे बाकी होते तेही आश्चर्य व्यक्त करीत सलीम’ला सलाम करीत आहेत.