कोल्हापूर (वृत्तसंस्था) राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राजकारण सुरु आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje) म्हणाले माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे ते त्या प्रमाणे निर्णय घेतली असा मला विश्वास आहे. छत्रपती घराण्याचा सन्मान ते करतील अशी मोजकिच प्रतिक्रिया संभाजी राजेंनी दिलेली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं, “माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. सविस्तर बोलणं झालं आहे. पुढे काय करायचं हे सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हा सुद्धा विश्वास आहे की, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. धन्यवाद.”
संभाजीराजे यांनी हे विधान करत पुन्हा एकदा राज्यसभेच्या उमेदवारीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलावला आहे. तर सहावा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजे हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत की नाही याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
संभाजीराजे हे कोल्हापुरातून आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. संभाजीराजे मुंबईत आल्यावर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत राज्यसभेच्या सहाव्या जागेचा हा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, आम्ही नक्की छत्रपती घराण्याचा मान राखून संभाजीराजेंना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला मी इतकंच सांगू शकतो. राज्यसभेच्या दोन जागेवर शिवसेना निवडणूक लढवणार.