मुंबई (वृत्तसंस्था) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजून खूप आवाज झाल्याचा आव मलिक आणतात, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी त्यांनी माझ्याशी बोलू नये. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो ट्विट केला. दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन, असं म्हणत त्यांनी मालिकांना इशारा दिलाय.
दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत. नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही,” असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
“भाजापाचे ड्रग्ज कनेक्शन आहे असे मलिक म्हणाले तर त्यांचे जावई ड्रग्जसोबत सापडले आहेत. नवाब मलिकांच्या म्हणण्यानुसार अख्खी एनसीबी ही ड्रग्ज माफिया व्हायला पाहिजे. कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्याने जर कोणी माफिया होत असेल तर ज्यांच्या घरी ड्रग्ज सापडतात त्यांचा पक्ष काय होणार आहे? नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
‘नीरज गुंडे यासंदर्भात स्वतः उत्तर देतील. पण नवाब मलिकांनी एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवं. नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच. मी जेवढे वेळा गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा उद्धव ठाकरे गुंडेंच्या घरी गेले आहे. गुंडे माझ्यापेक्षा जास्त वेळा मातोश्रीवर गेले आहेत. माझ्या आधीपेक्षा त्यांचे संबंध आहेत. पण मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा. वाझे पाळायची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले नवाब मलिक ?
देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.