नशिराबाद (प्रतिनिधी) ‘मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं. मुख्यमंत्रिपदासाठी खान्देशावर कायम अन्याय झाला. मी टरबुज्या म्हणणार नाही पण माझ्या डोक्यावर आणून ठेवला’ असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. नशिराबाद येथे एका सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्रीपदाचा अधिकार खान्देशाचा होता, स्वातंत्र्याला ७० वर्ष होऊन गेले तरी खान्देशवर अन्याय करण्यात येत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. “७० वर्षात कोकणात नारायण राणे, मनोहर जोशी असे मुख्यमंत्री झाले. विदर्भातील ४ नेते मुख्यमंत्री झाले आणि पाचवा देवेंद्र फडणवीस झाला” या शब्दात त्यांनी टीका केली. तसेच मराठवाड्यातील विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील कोणताही नेता मुख्यमंत्री झालेला नाही. उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदाचा अधिकार असतानाही सत्तर वर्षात एकही संधी देण्यात आली नाही, चाळीस चाळीस वर्ष पक्षात आम्ही हमाली केली, मात्र अधिकार असतानाही मुख्यमंत्रिपदापासून डावलण्यात आल्याची खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.