मुंबई (वृत्तसंस्था) आम्ही बंडखोरी केली तेव्हा अनेकांनी आमच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्या, आम्ही ५० आमदास निवडून येणार नसल्याचे ते म्हणाले, पण मी सांगतो या ५० आमदारांपैकी एकही आमदार पराभूत झालातर मी राजकारण सोडून देईन, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
बंडावेळी मी ३ दिवस आणि ३ रात्र झोपलो नव्हतो
शिवसेना आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. एक दोन आमदार आले असते तर ठीक पण पन्नास आमदार काही मागणी नसताना येतात, माझ्यावर विश्वास दाखवतात ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. ज्यावेळी बंड केलं, त्यावेळी मी राजकीय आत्महत्या केली, असं अनेक जण सांगत होते. पण मी नेमकं काय करतोय, याची मला पूर्णपणे जाणीव होती. बंडावेळी मी ३ दिवस आणि ३ रात्र झोपलो नव्हतो. माझ्या राजकीय करिअरची मला अजिबात भीती नव्हती, कारण मी ५० आमदारांच्या भवितव्याची चिंता केली होती, असंही शिंदे म्हणाले.
संभाजीनगरच्या नावाला स्थगिती नाही
ठाकरे कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबाद नामांतरला कोणतीही स्थगिती दिली नाही. ठाकरे सरकरने हा निर्णय घेतला होता त्याच्या आधी राज्यपाल यांनी पत्र दिले होते असे करता येत नाही. बहुमत सिद्ध करेपर्यंत कोणताही निर्णय घ्यायचा नसतो. अडीच वर्ष त्यांनी या विषयाला हात लावला नाही बहुमत गमावल्यानंतर निर्णय घेतला. पुढील कॅबिनेटला हा निर्णय आम्ही घेणार आहोत. हे तीनही निर्णय आम्ही घेणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.