मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्वत:च्या मुलीसंदर्भात एक धक्कादायक वक्तव्य केलंय. माझ्या मुलीला मी आता महाराष्ट्रात ठेवणार नाही, जर माझ्या मुलीला ईडीचं बोलावणं आलं तर ती आत्महत्या करेल , असं व्यक्तव्य आव्हाड यांनी केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना आव्हाड यांनी त्यांच्या मुलीला नुसतं चौकशीला बोलवलं तरी ती आत्महत्या करेल असं म्हटलंय. “तुम्हाला सेफ वाटतंय का?”, असा प्रश्न आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवर झालेल्या कारवाईनंतर विचारण्यात आला. आव्हाड यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, “मी तर काही चुका वगैरे केलेल्या नाहीत. पण काही सांगता येत नाही वरच्या टेपिंग बिपिंगमध्ये चुका असतील तर” असं म्हटलं.
पण भीती ही माणसाला खात असते
“एकूण कुटुंबाच्या दृष्टीने विचार करता…” असं विचारण्यात आलं तेव्हा प्रश्न पुर्ण होण्याआधीच आव्हाड यांनी, “मी अगदी स्पष्टपणे सांगतो, कोणी बोलो अथवा नाही पण भीती ही माणसाला खात असते. रात्री तीन वाजता टक् टक् झालं तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता असते,” असं उत्तर दिलं. असं वाटतं का ईडी येतंय? यावर “आता कोणाच्या ध्यानी, मनी स्वप्नीच नाही ना कोणाच्या घरी कोण घुसेल. यात सर्वात जास्त हाल होतात ते अशा माणसांचे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी काही संबंध नसतो,” असं आव्हाड म्हणाले.
जर नुसतं बोलवलं तर ती आत्महत्या करेल
पुढे बोलताना आव्हाड यांनी, “आज ३८ वर्षे होत आले मी राजकारणात आहे. माझ्या पोरीचा काय राजकारणाशी संबंध आहे. पण आज ती किती ठिकाणी डायरेक्टर आहे. जर नुसतं बोलवलं तर ती आत्महत्या करेल,” असं वक्तव्य केलं. “बापरे! हे फार मोठं वक्तव्य आहे तुमचं,” अशी प्रतिक्रिया महिला पत्रकाराने दिली. त्यावर बोलताना आव्हाड यांनी, “ते फ्री बर्ड्स आहेत ना त्यांना या असल्या सवयी नाहीत ना,” असं म्हटलं. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचं नाव नताशा असं असून काही महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं आहे.
माझ्या पोरीचं काय होईल
पण मग तुमची मुलगी या देशात राहणार नाही की काय?,” असा थेट प्रश्न विचारला असता आव्हाड यांनी नकारार्थी मान डोलवली. पुढे बोलताना त्यांनी, “मला तर वाटतं तिने राहू नये, वातावरण इतकं गढूळ होत राहिलं आहे. मी करोनामध्ये जेव्हा होतो तेव्हा मी तिची जी परिस्थिती बघितलेली तीच मला भितीदायक वाटत होती,” असं सांगितलं. “पण आता जर काही… माझ्या बाबतीत घडणार नाही याची मला १०० टक्के खात्री आहे, पण उद्या झालच तर मला पहिला मनात विचार येतो की माझ्या पोरीचं काय होईल,” असंही आव्हाड म्हणाले.