मुंबई (वृत्तसंस्था) वाझे यांच्यासोबत वरुण सरदेसाईंचे संबंध असल्याचा दावा करत आमदार नितेश राणे यांनी एनआयएने यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली होती. राणे यांच्या आरोपानंतर वरुण सरदेसाई यांनी न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला. देसाई यांच्या इशाऱ्यानंतर नितेश राणेही आक्रमक झाले आहेत. “शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत, मला नोटीस पाठवली, तर आम्ही शिवसेनेची प्रकरणं बाहेर काढू,” गर्भित इशारा राणे यांनी दिला आहे.
सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर वरुण सरदेसाई आणि नितेश राणे आमने-सामने आले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे. तपास यंत्रणांनी मागणी केल्यास त्यांना आम्ही पुरावे देऊ असं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं. काल वरुण सरदेसाई यांच्याकडून जे काही स्पष्टीकरण देण्यात आले, ते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असंच म्हणावं लागेल अशीही टीका त्यांनी केली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. NIA ने सचिन वाझे प्रकरणाची तपासणी करावी असं नितेश राणे यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितलं. धमकी कोणाला देत आहात? असा सवाल करत नितेश राणे यांनी आपण असल्या नोटिसांना अजिबात भीक घालत नाही असं वक्तव्य केलं. माझ्याकडे जी माहिती आहे ती NIA ने मागितली तर मी त्यांना देईन. ह्यांना कशाला देऊ ? असंही ते म्हणाले.
आमदार नितेश राणे म्हणाले की, “राणे कुटुंबियांनी ३९ वर्षे बाळासाहेबांच्या सोबत सेवा केलीय. त्यामुळे यांची सगळी अंडी-पिल्ली आम्हाला माहित आहेत. आमचं तोंड उघडायला लावू नका अन्यथा रमेश मोरे, सोनू निगम नंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणे बाहेर काढली जातील. त्याची तयारी असेल तर पाठवा आम्हाला नोटीस.”
पुन्हा अशा धमक्या देऊ नका, नाहीतर आणखी एक पत्रकार परिषद घेऊन ही सगळी प्रकरणे बाहेर काढावी लागतील. मग बघू महाराष्ट्रात कसे फिरता ते असंही आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य केलं. मी पत्रकार परिषदमध्ये उपनगरातले नेते असा उल्लेख केला तर मग अनिल परब यांना बोलायची गरज काय ? हे काय नेते आहेत का ? अशी टीका त्यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर केली.
सरदेसाई काय म्हणाले होते?
“राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय. आज ते भाजपामध्ये गेलेत, तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही,” असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होतं.