सांगली (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमक्या दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे. यावर आता किरीट सोमय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महा विकास आघाडीचे सरकार बरखास्त झालेली असेल, असा इशाराच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला दिला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले असताना, त्यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत आहात काय? मविआ सरकारने लक्षात असू द्याव्यात की, उद्या किरीट सोमय्या यांच्या केसाला जर धक्का लागला तर त्याच क्षणी महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार बरखास्त झालेले असेल”
भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. आता त्याच कराड विश्रामगृहावर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत घोटाळ्यांचा पाढा वाचला. तसंच सरकारने पोलिसांचा गैरवापर करुन माझ्याविरोधात दडपशाही केल्याचा आरोप केलाय.