कोल्हापूर (वृत्तसंस्था) छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे आणि ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी हे विधान केलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत, तर महाविकास आघाडी सरकारमुळंच आरक्षण टिकलं नाही असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. भाजपनं याविरोधात आंदोलनं करण्याचा इशाराही दिला आहे. याच मुद्दयावर आक्रमक झालेले संभाजीराजे राज्यव्यापी दौरा करत आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीत आंदोलनं करण्यास त्यांचा विरोध आहे. त्यांनी दोन्ही सरकारवर टीका केली आहे. भाजपचा संभाजीराजेंच्या याच भूमिकेला विरोध आहे. संभाजीराजे हे राज्य सरकारच्या कलानं वागत असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप आहे. आमदार नीलेश राणे व चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच या मुद्द्यावरून संभाजीराजेंवर टीका केली होती.
नारायण राणे यांनीही गुरुवारी संभाजीराजेंवर खोचक शब्दांत टीका केली. ‘संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्यानं ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा प्रश्न राणे यांनी काल उपस्थित केला होता.
राणेंच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी ट्वीट केलं आहे. ‘छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही, त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.