जळगाव (प्रतिनिधी) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात सहभागी झाले असतील तर त्यांना आता मंत्रिपद मागण्याचं कुठलंही कारण नाही, त्यांनी हिंदुत्वासाठीच लढावं, असा टोला माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लगावला आहे. जळगावच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी खडसे पुढे म्हणाले की, शिंदे गटात सहभागी झालेले आमदार नेमके हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये सहभागी झाले आहेत, की त्याला इतर काही कारणे आहेत, हे नेमकं कळत नाही. मात्र जर हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात सहभागी झाले असतील तर त्यांना आता मंत्रिपद मागण्याचं कुठलंही कारण नाही, त्यांनी हिंदुत्वासाठीच लढावं, असा टोलाही एकनाथराव खडसे यांनी शिंदे गटाला जाऊन मिळालेला आमदारांना उद्देशून लगावला आहे.
फडणवीसांवर पुन्हा टीकेची झोड !
एकमेकांना मदत करण्यासाठी, की एकमेकांचा इगो जपण्यासाठी या गोष्टी घडत आहेत. तसेच पत्रकार परिषदेत ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिठ्ठी दिल्याच्या मुद्द्यावरुन खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या हातातून माईक घेतला होता. आता पुन्हा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिंदेंना चिठ्ठी लिहून दिली. या गोष्टी नेमक्या एकमेकांना मदत करण्यासाठी घडत आहेत, की एकमेकांचा इगो जपण्यासाठी, हे आता सांगता येणार नाही. शिंदे गट व भाजप युतीतील सरकार पूर्ण क्षमतेने चालेल, त्यावेळेस नेमकं सांगता येईल, की कोण कोणाच्या इशाऱ्यावरून चाललंय, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.