जळगाव प्रतिनिधी : राज्यातील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा’ (पोकरा) दुसरा टप्पा सुरू करण्याच्या प्रक्रियेला अखेर वेग आला असून, आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. या योजनेची घोषणा होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडल्याने आमदार खडसे यांनी ९ डिसेंबर २०२५ रोजी विधान परिषद सभागृहात विशेष उल्लेख सूचना क्र. २३ द्वारे सरकारचे लक्ष वेधले होते.
यावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लेखी पत्राद्वारे माहिती देताना स्पष्ट केले आहे की, राज्यातील २१ जिल्ह्यांतील ७२०१ गावांमध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान थेट आधार संलग्न बँक खात्यात (DBT) जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ‘डीबीटी’ पोर्टलवर अर्ज करता येणार आहेत. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एकूण १२५७ पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ८९९ उमेदवारांना नियुक्ती पत्रे निर्गमित करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत ७९२ उमेदवार प्रत्यक्ष कामावर रुजू झाले असून, उर्वरित रिक्त पदांचा कार्यभार अतिरिक्त जबाबदारीद्वारे हाताळला जात आहे.
आमदार खडसे यांच्या आग्रही भूमिकेमुळे आता ग्रामस्तरावर ‘ग्राम कृषी विकास समिती’चे गठन पूर्ण झाले असून, समूह सहाय्यक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाला सुरुवात झाली आहे. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेल्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.















