जळगाव (प्रतिनिधी) माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार, माझा पीकपेरा या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमधून भरता यावा, याकरीता राज्य शासनाने १५ ऑगस्ट, २०२१ पासून ई पीक पाहणी प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी यासाठी आवश्यक ते नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील तहसिलदार यांच्या अथक प्रयत्नामुळे सहा तालुक्यातील १४ गावामध्ये १०० टक्के ई पीक पाहणीचे काम पूर्ण झाले असून या १४ गावांचे जिल्हाधिकारी राऊत यांनी विशेष अभिनंदन केले आहे. जळगाव जिल्हयात १५ ऑगस्टपासून खातेदाराने प्रत्यक्ष ई पीक पाहणी करण्यास सुरवात झाली असून तलाठी यांचे सक्रीय सहभागामुळे सुरवातीपासूनच जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. २८ ऑगस्टअखेर सर्व गावांमध्ये ई पीक पाहणी ॲप पोहचले असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७२ हजार ८६७ शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. तर ४२ हजार २८९ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पीक पाहणी भरली आहे. या कामगिरीमुळे जळगांव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) शुभांगी भारदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शिंगायत, रामपूर येथील तलाठी -अजय गवते, टाकळी खु.- दिपाली महाजन, गंगापुरी- मीनाक्षी पडागळे, हिंगणे बु. – फिरोज खान, चोपडा तालुक्यातील मालापुर, सलीम तडवी, मोरचिडा- अमीन अरमान तडवी, मुळ्यवतार- अजय लोका पावरा, एरंडोल तालुक्यांतील हनुमंतखेडे, यावल तालुक्यातील चिंचोली- निखिल मिसाळ, वाघोदे- पी एन नेहते, वाघझिरा -टी सी बारेला, चाळीसगांव तालुक्यातील कोंगानगर- वैशाली केकान, विसापूर- वृषाली सोनवणे, धरणगाव तालुक्यातील निशाणे खु. बसवेश्वर मजगे यांनी विशेष परिश्रम करुन गावात १००% ई पीक पाहणी पूर्ण केली आहे. याबद्दल जिल्हाधिकारी यांनी या गावांचे व महसूल यंत्रणेचे कौतुक केले असून ई पिक पाहणी यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील इतर गावे देखील यापासून प्रेरणा घेऊन सहभाग नोंदवतील व ई पीक पेरा स्वतः भरतील. असा आशावादही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केल्याचे उपजिल्हाकारी (महसुल प्रशासन) श्रीमती भारदे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहेत.