नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत ३४ हजार ४५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ३७५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३४ हजार ४५७ कोरोनाबाधित आढळले असून ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६१ हजार ३४० वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५१ दिवसांतील सर्वात कमी आहे. ११ दिवसांनी मृतांचा आकड्यात घट झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनामुळे आतापर्यंत ४.३३ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये काल दिवसभरात ५७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल ४,३६५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ हजार ३८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख २१ हजार ३०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७टक्के आहे. राज्यात काल १०५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ५५ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.