नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गेल्या दोन दिवसांपासून नवीन कोरोना बाधितांच्या संख्येची स्थिती स्थिर आहे. गेल्या २४ तासांत ३८ हजार ०७९ नवे कोरोना रुग्ण आढळले. याच कालावधीत देशात ५६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील २४ तासांमध्ये देशातील कोरोना रुग्णांपैकी ४३ हजार ९१६ जण बरे झाले.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३८ हजार ०७९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,९४९ आणि गुरुवारी ४१,८०६ कोरोनाबाधित आढळून आले होते. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ४३,९१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, म्हणजेच ६३९७ सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे. देशात सध्या चार लाखाहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात अद्याप ४ लाख २४ हजार कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण ४ लाख १३ हजार ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट अशी की आतापर्यंत एकूण ३ कोटी २ लाख २७ हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी १० लाख ६४ हजार लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे.
लसीकरण
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १६ जुलै पर्यंत देशभरात कोरोना लसीचे ३९ कोटी ९६ लाख ९५ हजार डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी ४२ लाख १२ हजार लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नुसार आतापर्यंत ४४ कोटी २० लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शुक्रवारी १९.९८ लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात शुक्रवारी दिवसभरात एकूण ७ हजार ७६१ नवे कोरोनाबाधित आढळले असून त्या तुलनेत १३ हजार ४५२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. बऱ्या झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीनंतर राज्यात आजपर्यंत कोरोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांचा आकडा आता ५९ लाख ६५ हजार ६४४ इतका झाला आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६१ लाख ९७ हजार १८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख १ हजार ३३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.