चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेले-आखातवाडे येथे वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हरीण, काळवीट शेतात घुसत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
चोपडा तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. तरी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. तसेच इतर पिकांची देखील पेरणी पूर्ण होत आलीय. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. जेमतेम पिकांना पाणी पुरवून बळीराजा दुबार पेरणीची वेळ येऊ नये, यासाठी चिंताचुर आहे. तशात वेले-आखातवाडे येथे हरीण, काळवीट यांचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
हरीण या शेतातून त्या शेतात वावरताना नुकतीच पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. याबाबत वनविभागाने लक्ष देऊन हरीणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वेले – आखातवाडे परिसरातील शेतकरी करत आहेत. तरी यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी आता जोर धरत आहे. वरील सर्व माहिती बिआरएस पक्षाचे कार्यकर्ते व उपसरपंच दिपक पाटील यांनी पत्रकारांच्या माध्यमातून सर्वाना माहिती व्हावी यासाठी सांगितली आहे. दिपक पाटील हे नेहमीच शेतकरी व गरीब होतकरु लोकांसाठी धावपळ करत असतात.