नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या कसोटीत भारतीय (India) संघाने ११३ धावांनी ऐतिहासिक असा विजय साकारला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सेंच्युरियन मैदानावर भारताने कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतक नाही तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड वगळता आफ्रिकेचा या मैदानावर पराभव करणारा भारत फक्त तिसरा देश आणि आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे.
सामन्यात सर्वप्रथम भारताने प्रथम फलंदाजी करत राहुलचं शतक, अगरवालचं अर्धशतकाच्या जोरावर ३२७ धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी दबदबा कायम ठेवला. १९७ धावांवर भारताने आफ्रिकेला सर्वबाद करत सामन्यावरील पकड मजबूत केली. ज्यानंतर १३० धावांची आघाडी घेऊन भारताने दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरु केली. पण भारताचा एकही फलंदाज खास कामगिरी करु शकला नाही. केवळ ऋषभ पंतने अखेरच्या काही षटकात ३४ धडाकेबाज धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने १७४ धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांची आवश्यकता होती.
त्यानंतर दक्षिण आफ्रिका त्यांचा दुसरा डाव खेळत असताना भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. आफ्रिकेचे सुरुवातीचे फलंदाज भारताने तंबूत धाडले. पण सलामीवीर आणि कर्णधार डीन एल्गर हा टिकून खेळत असल्याने भारताचा विजय काहीसा लांबला. एल्गर ७७ धावांवर बाद होताच नंतर एकही खेळाडू टिकू शकला नाही. ज्यामुळे सामना भारताने ११३ धावांनी जिंकला.