नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ईडी, सीबीआय, आयटीचा देशात दुरूपयोग होत असल्याचा आरोप करत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. तर दुसरीकडे संजय यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज राज्यभर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अखेर संजय राऊतांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून अटक झाली आहे. काल दिवसभराच्या मारेथॉन चौकशी नंतर मध्यरात्री ईडीने संजय राऊतांना अटक केल्याचे जाहीर केले. याच मुद्द्यावरून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आजच्या सत्रात केंद्रीय यंत्रणांच्या दुरूपयोगावर चर्चा घ्यावी यासाठी प्रियांका पत्र लिहिलं आहे. ईडी, सीबीआय, आयटीचा देशात दुरूपयोग होत असल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे. इतर विषय सस्पेंड करून यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. तर दुसरीकडे आज राज्यभर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राऊतांच्या अटकेवर राज्यभरातून सत्ताधाऱ्यासह विरोधकांकडून प्रतिक्रिया येताना दिसत आहे. राऊत यांना ताब्यात घेतल्याचे पडसाद महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण देशभरात उमटताना दिसत आहेत.