नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकरी आंदोलकांना ठार मारण्यात आलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेवर बोलताना राऊत यांनी देशात लोकशाही उरली आहे का?, लोकशाही भ्रष्ट झाली आहे, अशी संजय राऊत यांनी केली.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्ताने माखल्याचा टोला, शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. शेतकरी आंदोलन करताना लखीमपूरची दुर्घटना ही शेतकरी, मजूर यांच्यासाठी लांच्छनास्पद आहे. हा एका राज्याचा विषय नाही, अन्यायासाठी लढणाऱ्यांना असे केले जातं असेल तर जगासाठी हे धोकादायक आहे. ही भारत पाकिस्तान लढाई आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे
अशी घटना महाराष्ट्र, केरळ, राजस्थानमध्ये झाली असती तर भाजप रस्त्यावर उतरले असते. पण आज शेतकऱ्यांचे दुःख समजावून घ्यायला पण तिथं कुणाला जाऊ दिल जातं नाही, असं राऊत म्हणाले. काँग्रेस सोबत मतभेद असू शकतात, पण इंदिरा गांधी यांच्या नातीला अशी वागणूक देत आहात, हे योग्य नाही, असे राऊत म्हणाले.