भुसावळ (प्रतिनिधी) एकत्र कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब पद्धती पर्यंत पोहोचली आहे. समाजात व्यभिचार वाढत आहे. व्यक्तीची आर्थिक भूक संपायचे नाव घेत नाही.संस्कार हि एक प्रक्रिया आहे जी समाजाकडे बघून शिकता आली पाहिजे. संस्कार घेता आले पाहिजे. जर संस्कार नावाची शिदोरी जमा करायची असेल तर मनाची बांधणी गरजेची असल्याचे प्रतिपादन रवींद्र पाटील यांनी केले. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ऑनलाईन प्रबोधनमालेचे आज बुधवार रोजी तिसरे व अंतिम पुष्प गुंफण्यात आले.
यावेळी ‘संस्कार काळाची गरज’ या विषयावर विवेक विचार मंचचे प्रांत सदस्य तथा शिवशंभो विचार दर्शनचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख व्याख्याते रविंद्र पाटील यांनी संवाद साधला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाइनद्वारे दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, कर्जत जामखेडचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, नंदुरबारचे उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे तर व्यासपीठावर स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
अंतर्नाद म्हणजे विचारांची देणे देणारे ठिकाण आहे. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम अंतर्नादतर्फे राबवले जात असल्याची माहिती योगेश इंगळे यांनी प्रास्ताविकात दिली. दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, व्याख्यानमाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण त्या विचार, संस्कार, आणि प्रेरणा देतात. सुसंस्कृत समाजासाठी व्याख्यानमाला उपयुक्त असल्याचे ते म्हणाले.
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी आपल्या मनोगतात प्रबोधनाद्वारे प्रज्वलित मने निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली. तर समाजाच्या चांगल्या जडणघडणीत अंतर्नादचे खारीचे योगदान असते. चांगले विचार रुजावेत यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत वीरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.सकारत्मक विचारांची गरज समाजाला मोठया प्रमाणात आहे आणि ती गरज या प्रबोधनमालेतून पूर्ण होत आहे अश्या भावना नंदुरबारचे उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे याने व्यक्त केल्या.
संस्कार ही काळाची गरज
‘संस्कार ही काळाची गरज आहे’ या विषयावर बोलताना रवींद्र पाटील यांनी, समाजातील तरुण पिढीची भरकटत चाललेली दिशा, वाढलेला भ्रष्टाचार याकडे लक्ष वेधले.विविध थोर महापुरुष संतांची दाखले देत पुढे ते म्हणाले की, सहा विकार काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर याचा जो अंत करतो तोच संत.सहा विकार नष्ट केल्यानंतरच संस्काररुपी सत्पुरुष बाहेर येईल.हा देश माझा आहे आणि त्याच पद्धतीचे आचार, विचार, संस्कार आणि वर्तन आपले असले पाहिजे असे रवींद्र पाटील म्हणाले.
कार्यक्रमासाठी जळगावचे कलारसिक विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे अजय बढे, अमोल जावळे यांचे सहकार्य लाभले. प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, समन्वयक संजय भटकर, सहसमन्वयक देव सरकटे, राजू वारके, अमित चौधरी, साक्षी भटकर, रचना महाजन, शर्वरी पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले तर अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी आभार मानले.