जळगाव (प्रतिनिधी) ‘महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. जळगाव जिल्ह्यातही तो एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचं आहे. संघटनेचा विस्तार झाल्याशिवाय निवडणुकीत जिंकता येत नाही. माणसं जोडा, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवा, संपर्क वाढवा. ही जागा निवडून आणणं मोठी गोष्ट नाही,’ असा विश्वास एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. ते चाळीसगाव राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने चाळीसगावात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं आज पाटील जळगावात आहेत. चाळीसगाव इथं पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. ‘राष्ट्रवादी परिवार संवाद हा कुटुंबातला संवाद आहे. या संवादाच्या माध्यमातून काही सूचना याव्यात आणि त्यातून पक्षाच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी हे अपेक्षित आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले. ‘कार्यकर्त्यांची एक मोठी फळी इथं आहे. नेते व पदाधिकाऱ्यांबद्दल असलेल्या सहानुभूतीचं रूपांतर मतांमध्ये करा,’ असंही पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांचंही त्यांनी कौतुक केलं. ‘खडसे साहेबांसारखे अनुभवी नेते आपल्याला मिळाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फार उपयोग होईल याबाबत मनात शंका नाही,’ असं पाटील म्हणाले. यावेळी भाजपमधील डझनभर खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
‘२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपण चाळीसगावमध्ये ४ हजार मतांनी पराभूत झालो. परंतु २०२४ च्या निवडणुकीत याची परतफेड करा. महिला, युवक, युवती, विद्यार्थ्यांनी झपाट्याने कामाला लागा. २०२४ साली ही जागा निवडून यायलाच हवी,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केलं. एकनाथ खडसे यांनी या परिसरात मोठे काम केले आहे. त्यांनी जो पक्ष वाढवला. तो सोडून देणे त्यांना मानवत नव्हते. त्यांनी राष्ट्रवादीत येण्यासाठी सहा ते आठ महिन्याचा अवधी घेतला. आमचेही प्रयत्न सुरुच होते. अखेरीस त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मीदेखील संयम ठेवला. असे जयंत पाटील म्हणाले. जिल्ह्यात पक्षाला फक्त एक जागा मिळाली आहे. त्यामुळे २०२४च्या विजयासाठी आजच संकल्प करा. असे आवाहनही त्यांनी केले.
















