मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे कालपासून समीर वानखेडे यांची भेट घेत आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनामघ्ये मी त्या नेत्यांची नावं जाहीर करणार आहे. त्यानंतर या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. वानखेडेंच्या कुटुंबियांना गोवलं जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.
७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत असून त्यामध्ये माझ्यावर भाजपाकडून बरेच आरोप आणि हल्लाबोल केला जाईल, असं मलिक यांनी म्हटलं आहे. सध्या मी कोणत्याही नेत्याच्या आरोपाला उत्तर देऊन प्रकरणावरुन लक्ष डायव्हर्ट करु इच्छित नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक नावं समोर येणार आहेत, असं मलिक म्हणालेत. मुंबईतील क्रूझ पार्टीच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या काशीफ खानला अटक झाल्यानंतर सखोल चौकशीमध्ये अनेकांची नावं समोर येतील. अनेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटा हटेल. त्याच्याकडे किती लोकांचा पैसा आहे. त्याच्या माध्यमातून काय काय होतं आणि कोणत्या गोष्टी चालतात हे सुद्धा समोर येईल, असंही मलिक म्हणाले आहेत.
मी एनसीबीला एका अधिकाऱ्याने पाठवलेलं पत्र दिलं तर त्यावर कारवाई होणार नाही असं सांगण्यात आलं. पत्रावर नाव नसल्याने त्याची दखल घेतली जाणार नाही असं म्हटलं गेलं. मात्र त्या पत्रात नमूद केलेल्या २६ प्रकरणांची चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे. यापैकी २२ व्या प्रकरणामध्ये एका नायझेरियन व्यक्तीला कारण नसताना अडकवण्यात आल्याचं पंच कांबळे यांनीच स्पष्ट केल्याचंही मलिक म्हणाले. डीजी एनसीबींना मी पत्र पाठवलं आहे. सीबीसीच्या निर्देशांनुसार ही २६ प्रकरण बंद न करता त्याची चौकशी करा, गुन्हेगारांना पकडा हे तुमचं कर्तव्य, गुन्हेगार नसेल तर त्यांना अटक होता कामा नये, असं मलिक म्हणालेत.
ड्रग्ज पार्टीतील दाढीवाला सेक्स रॅकेट, पोर्नोग्राफी, ड्रग्ज रॅकेट चालवतो. त्याला अटक का केली नाही? ज्याने पार्टी आयोजित केली होती. त्याला कसं सोडून दिलं जाऊ शकतं? पार्टीचा आयोजकची पार्श्वभूमीच ड्रग्ज रॅकेटची असताना त्या अँगलने तपास का केला नाही? असा सवाल करतानाच पार्टीतील 1300 लोकांचा तपास का झाला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.
मी काही लोकांची पोलखोल केली आहे. त्यामुळे माझे वडील भंगारवाला होते म्हणून मला डिवचले जात आहे. होय, माझे वडील भंगारवाला होते. मी भंगारवाला आहे. पण मी कुठलीही बँक बुडली नाही. सोन्याची तस्करी केली नाही. कुणालाही फसवले नाही. माझ्या घरी कधीही सीबीआयची रेड पडली नाही, असा शब्दात मलिक यांनी सुनावले.