जळगाव (प्रतिनिधी) शहरातील महिला बचत गट आणि शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजार पेठ साठी जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे. भरिता साठी प्रसिद्ध असलेले वांग्यांना पिकाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील असून महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी खान्देश महोत्सव उपयुक्त ठरणार असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगाव शहर महापालिकेच्या महिला व बालक कल्याण विभागातर्फे चार दिवसीय खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त अविनाश गांगोडे, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, अभिजित बाविस्कर, गणेश चाटे, सेनेच्या संपर्क प्रमुख सरिता ताई कोल्हे – माळी, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, अॅड. दिलीप पोकळे, आशुतोष पाटील, आदी उपस्थित होते. महोत्सवाच्याप्रास्ताविकात मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी आयोजनाची भूमिका विशद केली. आमदार सुरेश भोळे यांनी आभार मानले.
डायनॅमिक पालकमंत्री : खासदार उन्मेष पाटील !
खासदार उन्मेष पाटील यांनी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे *’आमचे डायनॅमिक पालकमंत्री’,* असा उल्लेख करत भाषणास सुरवात केली. राज्यात सर्वाधिक डीपीसीचा निधी विकासकामांसाठी मनपा, जिल्हा परिषद व प्रशासनाला देण्याचा नवा पायंडा पालकमंत्र्यांनी पडला.
महिला गटांना व्यासपीठ : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड !
आयुक्त डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या, की खानदेश महोत्सव ही जळगावकरांसाठी एक खास मेजवानी आहे. महिला बचतगटांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह त्यांना रोजगार मिळतो. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, तर भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. या वेळी उपायुक्त निर्मला गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.