मुंबई (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत टास्क फोर्सचे तज्ज्ञ आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली (Maharashtra Task Force meeting). या बैठकीत लॉकडाऊनऐवजी करोना निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती आहे. त्यानुसार संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी केली जाऊ शकते. (Ajit Pawar holds meeting on lockdown)
राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊनचा पर्याय निकालात निघाल्याने राज्यातील नोकरदार, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकते. राज्य सरकार हा धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे सरकार अजूनही लॉकडाऊन न करण्यावर ठाम असल्याचे समजते. तर दुसरीकडे राज्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन आणि तिसऱ्या लाटेचं दुहेरी संकट पेलण्यासाठी सध्या मुंबई आणि पुण्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत.