जळगाव (प्रतिनिधी) गोद्री येथे हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभमध्ये सुमारे ४०० बचत गटांचे स्टॉल लागले होते. मात्र, या स्टॉलधारक महिलांच्या स्टॉलसाठी वॉटर प्रूफ टेन्ट नसल्यामुळे २५ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे या स्टॉलधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. या ढिसाळ नियोजनाच्या प्रकाराला जिल्हा अभियान व्यवस्थापक व प्रकल्प संचालक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मुक्ताई सरस प्रदर्शनासाठी शासनाकडून ५० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. यातून बचत गटांसाठी वॉटरप्रूफ टेन्ट उभारणे व इतर सुविधा होणे अपेक्षित होते. मात्र, यात महिला सदस्यासांठी निवासाची स्वतंत्र व्यवस्थाही नव्हती, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, बेमोसमी पावसामुळे आहे.
झालेल्या नुकसान भरपाईबाबत महिलांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक किशोर राणे व प्रकल्प संचालक स्नेहा कुडचे यांच्याकडे तक्रार केली होती. कुडचे यांनी पंचनामे करून नुकसानीची रक्कम जमा करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. आयोजनापूर्वी स्टॉलचा विमा उतरविला नसल्याची बाब समोर आली आहे. तरी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी तक्रारदार भोळे यांनी केली आहे.
बचतगटांसाठी मंडप देखील वॉटर प्रूफ होते. मात्र, पहिल्या दिवशी अचानक आलेल्या पाऊस व वायामुळे बचत गटांच्या स्टॉलचे किती नुकसान झाले, याबाबत माझ्यापर्यंत माहिती आलेली नाही. जर कुणाचे नुकसान झाले असेल, त्या बाबत चौकशी करून सबंधिताना मदत मिळण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी माधामांशी बोलतांना दिली आहे.