मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई उच्च न्यायालयाने आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांची मागणी फेटाळली आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगत मागणी फेटाळली आहे.
वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्यामध्ये कोणताही अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार देताना सांगितले की, या क्षणी जे काही आरोप लावण्यात आले ते चुकीचे आहेत असे म्हणता येऊ शकत नाही. तथ्याच्या आधारावर मंत्री ट्विट करू शकतात अशी टिप्पणी न्यायालयाने केली. ज्ञानदेव वानखेडे एनसीबीच्या मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचे वडील आहेत. त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात सव्वा कोटीचा दावा दाखल केला आहे. समीर वानखेडे तसेच कुटुंबीयांविरोधात केलेल्या विधानांच्या विरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. नवाब मलिकांना माध्यमांसमोर तसेच सोशल मीडियात वानखेडे कुटुंबाविरोधात बोलण्यासाठी प्रतिबंध करावा, अशी मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी केली आहे.
दरम्यान, न्यायालयाने कोणताही दिलासा देण्याचे फेटाळल्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सत्यमेव जयते. अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील.