जळगाव (प्रतिनिधी) मनियार बिरादरीच्या तडजोड समितीमार्फत साठ दिवसात ४ तलाक, १ खुलअ, तर १० जोडप्यांचे वैवाहिक जीवन पुन्हा बहरले आहेत, अशी माहिती जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व तडजोड समितीचे अध्यक्ष सय्यद चांद यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा मनियार बिरादरीमार्फत सुरू असलेल्या तडजोड समितीच्या माध्यमाने पती-पत्नीमधील वैवाहिक वाद सोडवले जात असून लॉकडाऊनच्या जून व जुलै २०२१ महिन्यातील ६० दिवसात एकूण २० प्रकरणे नोंदली गेली होती. त्यातील १५ प्रकरणात अंतिम कारवाई करण्यात आली. त्यात पती-पत्नीच्या आपसातील समझोता करारानुसार ४ तलाक करण्यात आले. तर एका प्रकरणी पत्नीने पतीपासून विभक्त होण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने तिला खूलअ (विभक्त) देण्यात आला. तर १० वैवाहिक जोडप्यांचा अटी – शर्तीसह करारनामा करून त्यांना पुनश्च आपले वैवाहिक जीवन एकत्र जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. अशाप्रकारे २० प्रकरणातून १५ प्रकरणी अंतिम निर्णय झाला व ५ प्रकरण प्रगतीपथावर आहेत. जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व तडजोड समितीचे अध्यक्ष सय्यद चांद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील व खास करून महाराष्ट्रातील संपूर्ण ३६ जिल्ह्यांमधून विविध बिरादरीचे वैवाहिक वादाची प्रकरणे जळगाव जिल्हा मनियार बिरादरीकडे येत असतात व बिरादरीच्या माध्यमाने ती सोडवली जातात. महाराष्ट्रात जळगाव जिल्हा मानियार बिरादरी अशी एकमेव बिरादरी आहे. जी सर्व बिरादरीचे प्रकरणे हाताळीत असून त्यात त्यांना यश मिळत आहे. बिरादरीकडे आतापावेतो २२३२ प्रकरणाची नोंद झालेली आहे.
तडजोड समितीचे फारूक शेख, सैयद चांद, हारून शेख, सलीम मोहम्मद, ताहेर शेख, अब्दुल रउफ, अल्ताफ शेख, इकबाल वजीर, सादिक मुसा हे सदस्य असून ते सदर तडजोड करीत असतात.