गुमला (वृत्तसंस्था) सनातन धर्माचा मानवजातीच्या कल्याणावर विश्वास असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी केले. देशाच्या भविष्याबाबत आपण कधीही चिंतित नव्हतो. कारण अनेक लोक देशाच्या भल्यासाठी सामूहिकरीत्या काम करत असल्याचे ते म्हणाले. तसेच कोरोना संकटानंतर भारताकडे शांतता व आनंदीपणाचा मार्ग असल्याचे जगाला कळाल्याचेही सरसंघचालकांनी नमूद केले.
स्वयंसेवी संस्था ‘विकास भारती’ कडून आयोजित ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सनातन धर्माचे महत्त्व अधोरेखित केले. सनातन धर्माचा मानवजातीच्या कल्याणावर विश्वास आहे. गेल्या दोन हजार वर्षांत जगभरात विविध प्रयोग करण्यात आले; परंतु शांतता व आनंद निर्माण करण्यात हे प्रयोग अयशस्वी ठरले. मात्र भारताच्या पारंपरिक जीवनशैलीतच आनंद व शांतता रुजलेली आहे. कोरोना संकटानंतर जगाला याची प्रचीती आल्याचे भागवत म्हणाले. तसेच देशाच्या भविष्याबाबत आपल्याला कोणतीही चिंता नाही. कारण देशाच्या भवितव्यासाठी सर्व जण मिळून काम करत आहेत. देशातील अनेक लोक लोकप्रियतेपासून दूर राहत देशाच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे भागवत यांनी नमूद केले.
देशातील लोकांच्या पूजा-अर्चनेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कारण आपल्याकडे ३३ कोटी देवी-देवता असून ३,८०० हून अधिक भाषा बोलल्या जातात. इतकेच नाही, तर खाणपाणाच्या पद्धतीदेखील भिन्न आहेत; परंतु भिन्नता असली तर आमचे मन एक आहे. अन्य देशांमध्ये असे पाहायला मिळत नसल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. आजघडीला काही तथाकथित प्रगतिशील लोक समाजाला परत देण्यात विश्वास ठेवतात. पण ही बाब भारतीय संस्कृतीत अगोदरपासून दडलेली आहे. ही गोष्ट कुठल्याही शास्त्रांमध्ये लिहिलेली नाही. पण पिढी दर पिढी हे स्वभावगुण पुढे वाढत गेल्याचे भागवत म्हणाले.