जळगाव (प्रतिनिधी) मुस्लिम समाजाच्या लग्न सोहळ्यात उलमा हे निकाहला उपस्थित राहतील निकाह लावून देतील. परंतु त्या लग्नातील जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असा एकमुखी निर्णय जळगाव शहरातील तंझीम उलमा व आयम्मा म्हणजेच मुल्ला-मौलाना यांनी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणीला सुरुवात सुध्दा झाली आहे. दरम्यान, या निर्णयाचे मानियार बिरादरीने स्वागत केले आहे.
प्रत्येक समाजात लग्नात लाखो रुपये खर्च केले जातात व त्याचा संपूर्ण भुर्दंड हा वधूच्या पालकांना सहन करावा लागतो, वास्तविक पाहता इस्लाम धर्मात नीकाह अर्थातच लग्न हे अत्यंत साधे व सरळ आहे. परंतु काही लोकांनी यास मोठे स्वरूप देऊन धर्मांच्या नियमाची पायमल्ली केलेली आहे. परंतु कोरोनामुळे लोकांना सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. व त्याचा एक भाग म्हणून सध्या लग्न सराई मध्ये मर्यादित लोकांची उपस्थिती व मर्यादित लोकांची जेवणावळी होत आहे. परंतु आता मुस्लिम वधूच्या लग्नसोहळ्यात मौलाना जेवणार नाही, असा निर्णय तंझीम उलमा व आयम्मानी घेतला आहे.
जळगाव मानियार बिरादरीने केले स्वागत व अभिनंदन
सोमवारी १४ मार्च रोजी मस्जिद ए उमरमध्ये ईकरा हायस्कूल बोरणार मध्ये कार्यरत हारून शेख यांच्या कन्याचे लग्न नंदुरबार येथील मनियार आसीम अकील यांच्यासोबत लागले. जळगाव शहराचे शहर काजी व उलमा कौन्सिलचे क्रियाशील सदस्य मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी खुदब ए निकाह सादर केला व लग्न सोहळे हे मुस्लिम पर्सनललॉ नुसार घेण्यात येईल व त्यास तुमची संमती आवश्यक असल्याचे आव्हान केले असता लग्न सोहळ्यात उपस्थित महाराष्ट्र मानियार बिरदारीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, कार्याध्यक्ष अब्दुल समद बारी, (नंदुरबार) सचिव डॉक्टर अल्तमश शेख, शहर अध्यक्ष सैयद चाँद, खजिनदार ताहेर शेख, तय्यब शेख, साजिद रज्जाक, जाहिद हुसेनसह नंदुरबारचे लियाकत, जुबेर शेख, वहिद कादिर यांनी जळगाव शहरातील उलमा यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. प्रातिनिधिक स्वरूपात उलमा कौन्सिलचे प्रतिनिधी मुफ्ती अतिकउर रहमान यांचे फारूक शेख यांनी शब्द सुमनाने अभिनंदन सुद्धा केले.
मानियार बिरादरी संपूर्ण महाराष्ट्रात हा नियम लावणार
कोविड महामारी संपल्यावर जळगाव जिल्हा मानियार बिरादरी व महाराष्ट्र महा मन्यार बिरादरीमार्फत एक मेळावा घेण्यात येणार असून त्यात लग्नाची आचारसहिता ठरविण्यात येईल असे महाराष्ट्र मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी घोषित केले आहे.
लग्नाची आचार संहिता
१) साखर पुडा (मगनी) ही पद्धत बंद करण्यात येईल.
२) लग्न शक्यतो सामूहिक विवाह कार्यक्रम अंतर्गत पार पाडणार.
३) वैयक्तिक लग्नसमारंभात वधूकडे फक्त पन्नास लोकांची वरात वर घेऊन जाणार.
४) वधूकडे स्थानिक पातळीवरील वराकडील नातेवाईकांना सुद्धा जेवणावळीमध्ये सहभागी होता होणार नाही.
५) कोणत्याही पद्धतीने वधू कडून हुंडा (दहेज) घेण्यात येणार नाही
६) लग्न अर्थातच निकाह हा मशिदी मध्येच लावण्यात येईल
७) वधु घरी आल्यावर वरा कडून दुसऱ्या दिवशी वलिमा म्हणजेच जेवणाची पंगत देण्यात येईल तीही त्याच्या ऐपतीनुसार
८) वधूकडील मंडळीने सुद्धा स्थानिक पातळीवर आपल्या शहरातील व मोहल्ल्यातील मंडळींना फक्त निकाह साठी आमंत्रित करावे जेवणाचे आमंत्रण देता कामा नये
९) वधूपित्याने मुलीच्या लग्नवर खर्च न करता शरियतनुसार मुलीला आपल्या प्रॉपर्टी मधून तिचा हक्क देण्यात यावा.( विरासत हक्क)
उपस्थितांची इंशाल्लाह म्हणून दाद
लग्नाची आचार संहिता समाजात, बिरादरीमध्ये जाऊन सर्व संमतीने तो निर्णय घेऊ त्यावर उपस्थितांनी त्यास इंशाल्लाह म्हणून संमती दिली.