जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा तडवी समाजाच्या असून त्यांना जात प्रमाणपत्र वेळेत सादर करता येवू नये, यासाठी राजकिय हस्तक्षेप करण्यात आला. त्यांनी अनेक चकरा मारून देखील समितीकडून जात प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्या अपात्र झाल्या. मात्र अपात्रतेच्या कारवाई नंतर त्यांना जात प्रमाणपत्र मिळाले, असा आरोप अधिवेशनात चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी केला. नगराध्यक्षा तडवी यांच्यावर हा अन्याय असून या पुढे अशा घटना घडू नये, यासाठी समितीला जात प्रमाणपत्र देण्यासाठी वेळेची मुदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा तडवी यांच्या जात प्रमाणपत्रा संदर्भातील विषय मांडला होता. आ. चव्हाण यांनी आज अधिवेशनात जात प्रमाणपत्राच्या विषयावर बोलतांना सभागृहाचे लक्ष वेधले. राजकारणात आल्यानंतर अनेकांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न असते. कधी नव्हे ती संधी मिळते. शासनाने निवडणूका झाल्यानंतर ग्रामपंचायत, जि.प, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची वेळ दिली जाते. मात्र ते वेळेत दिले जात नाही.
मुक्ताईनगर नगराध्यक्षा तडवी यांनी समितीकडे चकरा मारून देखील जात प्रमाणपत्र मिळाले नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे समितीने दिले नाही. मात्र अपात्र झाल्यावर ते देण्यात आले. जे लोक जनतेतून निवडून येत नाही, ते लोक निवडलेल्या लोकांना असा त्रास देतात असा टोला त्यांनी लगावला. या प्रमाणपत्रासाठी लाख दोन लाख रूपये दयावे लागतात असा आरोप त्यांनी केला. दरम्यान समित्यांना वेळेत प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.