नागपूर (वृत्तसंस्था) पालिका निवडणुक हा मनसेसाठी धक्का मानला जात आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी मनसे भाजप युती होणार का?, या चर्चा रंगताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. त्यामुळे भाजपा आणि मनसे एकत्र येणार का? या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय.
देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दिल्लीत होते. ते आज दिल्लीहून नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती होणार का?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मनसेनं परप्रांतीयांचा मुद्दा सोडला तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याकडे देवेंद्र फडणवीसांचं लक्ष वेधलं असता त्यांनी चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही. मनसेसोबत युतीचा निर्णय योग्यवेळी होईल. अजून त्याला वेळ आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, दिल्लीत नवीन केंद्रीय मंत्र्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. व केंद्रात कामं असतात त्यासाठी जावं लागतं त्याचा राजकीय अर्थ काढू नका, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.