मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड वेळी अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातकं मोदी सरकारने करु नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
पवार म्हणाले, “कृषी बिलं सिलेक्ट कमिटीकडे न पाठवता गोंधळात सभागृह मंजूर करण्यात आली तेव्हाच मला वाटत होतं की हे बिघडू शकतं कुठेतरी शेतकरी वर्गाकडून यावर प्रतिक्रिया येऊ शकते. गेल्या ५० ते ६० दिवस पंजाब भागातील शेतकऱ्यांनी या कायद्यांसंबंधी भूमिका घेतली आणि अत्यंत शांततेत त्यांनी आंदोलन केलं. इतका काळ संयम दाखवणं ही अभूतपूर्व गोष्ट आहे. इतक्या संयमानं भूमिका घेत असताना केंद्रानं यावर संयमानं भूमिका घ्यायची होती. मात्र, सरकारला आपला स्टँड सोडायचाच नाही त्यामुळे सर्व चर्चा अपयशी झाल्या.” इतके दिवस शांततेत आंदोलन करुनही तोडगा निघत नसल्याने यासंदर्भात मोठं आंदोलन करावं यासाठी त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. शांततेत आंदोलन करणारे हे लोक रस्त्यावर उतरणार होते म्हणून केंद्रानं त्यांच्याकडे समंजसपणानं बघण्याची गरज होती. मात्र, तसं घडलेलं नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात येणं आणि जाणं याबाबत जाचक अटी लादल्या गेल्या. त्याला प्रतिकार झाला पण तिरीही सरकारनं ६० दिवसांचा त्यांचा समंजसपणा लक्षात घ्यायला हवा होता. हे वातावरण चिघळलं आहे, पण हे का घडलं याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, अशी भूमिका यावेळी पवार यांनी मांडली.
शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून केंद्र सरकारला कानपिचक्या दिल्या. अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. टोकाची भूमिका घेऊ नये. शेतकऱ्यांच्या रास्त प्रश्नांसंबंधित अनुकूल निर्णय घ्या, असं सांगतानाच बळाचा वापर करून निर्णय घेणं योग्य नाही. तशी मानसिकताही ठेवू नका. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आपण पाहिला आहे. तो सावरलेला आहे. पुन्हा पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक मोदी सरकारने करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.