नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही पण त्यांना आपल्याच देशात फिरायला भीती वाटते, असे म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.
कन्हैया कुमार म्हणाले, “दोन दिवसांपासून टीव्हीवर सुरू आहे की पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली. २४ तास हेच सुरू आहे. मात्र, पंतप्रधान मोदींकडे तर ५६ इंचची छाती आहे, तर मग त्यांना घाबरण्याची काय गरज? हे म्हणतात पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असत नाहीत, देशाचे असतात. पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतील, तर मग पंतप्रधानांनी कोणत्याही पक्षाचा प्रचारही करायला नको.”
“जर सुरक्षेत त्रुटी असतील तर तुम्ही पंतप्रधान आहात, तुमच्याकडे सरकार आहे. गृहमंत्री तुमचे मित्र आहेत, विशेष सुरक्षा पथक (SPG) त्यांच्या अंतर्गत आहेत. तुम्ही तपास करून सुरक्षेत कुठे चूक झाली हे शोधा. पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही, आपल्याच देशात फिरायला यांना भीती वाटते. हे अजिबात चालणार नाही,” असं कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं. “एकीकडे म्हणतात मजबूत पंतप्रधान आहेत आणि दुसरीकडे पळून जातात,” असं म्हणत कन्हैय्या कुमार यांनी मोदींवर निशाणा साधला.
कन्हैया कुमार पुढे म्हणाले, “एका राज्यातील सर्व लोकांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. सुरक्षेतील त्रुटीचं निमित्त करून पंजाबमधील लोकांना दहशतवाद्यांप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पंजाब आपल्या देशाचा भाग आहे. पंतप्रधानांचा कुठं कार्यक्रम असेल तर सुरक्षेची जबाबदारी एसपीजीची असते. एसपीजीचा प्रमुख गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटीचा प्रश्न पंतप्रधानांनी आपल्या जिगरी मित्राला विचारला पाहिजे.”