नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील वादही समोर आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेवेळी मोदींजी स्वत:चीच ‘मन की बात’ सांगत बसले असं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या म्हंटल की, “आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. त्यांनी फक्त त्यांच्या ‘मन की बात’ केली. पण त्या ऐवजी ‘काम की बात’ केली असती आणि ऐकलीही असती तर बरं झालं असतं”.
गुरुवारी संध्याकाळी उशिरा सोरेन यांनी हे ट्विट केलं. त्यानंतर हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणासहित अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्याशी कोविड संकटावर चर्चा केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. यापूर्वीच्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांसोबतची बैठक लाईव्ह केली होती. त्यावर पंतप्रधानांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे केजरीवाल यांना माफी मागावी लागली होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झारखंड राज्यालाही संसाधनांचा तुटवडा भासत आहे. आपल्या अपेक्षित मदत मिळत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. झारखंडचे आरोग्य सचिव अरुण सिंग म्हणाले की, राज्याला रेमडेसिविर इंजेक्शनच्या फक्त २,१८१ कुप्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सिंग म्हणतात, “इतर कोणतीही मदत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. झारखंडला बांग्लादेशक़डून रेमडेसिविर इंजेक्शनच्या ५०हजार कुप्या आयात करायच्या आहेत. मात्र, अजूनही परवानगी मिळालेली नाही”.