मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्याविषयी तक्रार केली. मात्र, वानखेडे यांचे हे आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या नसल्याचं गृहमंत्री वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
“मला वाटत नाही की मुंबई पोलिसांचे अधिकारी वॉच ठेवतात वगैरे. तशा कोणत्याही सूचना कुणालाही दिलेल्या नाहीत”, असं दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले. तसेच, त्यांच्या आरोपांविषयी आपल्याला फार माहिती नाही, त्याची अतिरिक्त माहिती घेऊन मी त्यावर बोलेन, असं देखील वळसे पाटील यावेळी म्हणाले.
वानखेडेंचे आरोप काय?
दरम्यान, समीर वानखेडे यांनी पोलीस पाळत करत असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली होती. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यांवरही टीका केली होती. एनसीबीने भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शाहरुख खानला टार्गेट केलं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी एनसीबीने ज्या दिवशी क्रूझ पार्टीवर कारवाई केली त्यादिवशी काही भाजप नेतेही त्यांच्यासोबत होते, असा दावा मलिक यांनी केला. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडीओ देखील दाखवत त्याचे पुरावे दिले होते. त्यामुळेच वानखेडेंवर पाळत ठेवली जातेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. याप्रकरणी स्वत: समीर वानखेडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.