जळगाव (प्रतिनिधी) अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) सोमवारी नांदेड, जालना आणि औरंगाबादसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत छापेमारी केल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. नांदेड गांजा प्रकरणातून समोर आलेले ‘एरंडोल कनेक्शन’कडे मात्र दुर्लक्ष केले जातेय का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील मांजरम (ता.नायगाव) येथे पथकाने १५ नोव्हेंबर रोजी पाठलाग करून ११ कोटींचा गांजा पकडला होता. या वेळी दोन जणांना अटक करण्यात आली होती. यात एरंडोलच्या सुनील महाजन नामक व्यक्तीचा समावेश होता. या कारवाई पासून एनसीबीचे पथक नांदेड जिल्ह्यात पथक तळ ठोकून बसले आहे. एनसीबी पथकाने सोमवारी माळटेकडी परिसरातील एका व्यापारी संकुलात धाड टाकली. या धाडीमध्ये पथकाला एक क्विंटल वजनाची अफू बोंडे जप्त करण्यात आल्याचे कळते. दरम्यान, या कारवाईबाबत अद्याप दुजोरा मिळालेला नाहीय.
दुसरीकडे अमली पदार्थांच्या परराज्यातून होणाऱ्या तस्करीचे जाळे औरंगाबाद, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतून राज्यभरात पसरले आहे. यात एरंडोल हे गांजा तस्करीच्या बाबतीत मोठे केंद्र बनल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतू नांदेडमधील कारवाईनंतर एनसीबीचे पथक जालना, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये धाडी टाकतेय. परंतू ज्या ठिकाणी करोडोचा गांजा उतरणार होता, त्या ‘एरंडोल कनेक्शन’कडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक बघता ‘एरंडोल कनेक्शन’ तपासून पाहिल्यास वनकोठे, कासोद्यासह पुणे, मुंबई, धुळे, नाशिक सारख्या शहरांपर्यंतची साखळी उघड होऊ शकते, असे बोलले जात आहे.