मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) नवाब मलिक (Nawab Malik) यांना दिलासा नाहीच. नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (judicial custody) देण्यात आली आहे.
यापूर्वी नवाब मलिक (Nawab Malik) हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान ईडीने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यास हरकत नसल्याचे सांगितले. मात्र, चौकशीसाठी त्यांच्या कोठडीचा कालावधी वाढवून मागितला. पीएमएलए न्यायालयाने ही मागणी मान्य करत नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु, नवाब मलिक यांच्या वकिलांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर संध्याकाळपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ईडीने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी चौकशीनंतर ताब्यात घेतले होते. यावरून महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे. भाजपकडून अधिवेशनात सातत्याने नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जात आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांच्या कोठडीची मुदत वाढवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकासआघाडीच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
















