जळगाव (प्रतिनिधी) भाजप हा नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष असून एकनाथराव खडसे असो की, अन्य कोणी असो ते पक्ष सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही, अशा शब्दात माजी ऊर्जा मंत्री तथा भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसेंवर निशाणा साधला. ते जळगावातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपच्या २५ लाख युवावर्गाला जोडण्याच्या मोहिमेसाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी ते जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. बावनकुळे यांनी सांगितले की, कोणी पक्ष सोडला तर भाजपला काही फरक पडत नाही. खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मग प्रवेश करताच त्यांना मंत्रिपद का दिले नाही? असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला.
खडसे हे सर्वांसाठी आदरणीय नेते होते. सभागृहात देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील त्यांचा सल्ला घेत होते. मुळात खडसेंवर कोणी अन्याय करेल इतकी ताकद कोणाची नव्हती. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षातील कितीही मोठा नेता अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंतचा मोठा नेता जरी पक्ष सोडून गेला तरी पक्षाला फरक पडत नाही. खडसे पक्ष सोडून गेले तरी त्यांच्या जागेवर पक्षाला फरक पडत नाही. एवढेच नव्हे तर, लोकसभा, विधानसभा जिंकतीलच असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.