मुंबई (वृत्तसंस्था) “काय नेता मिळाला आहे देशाला. यांना लोक आपल्याला विसरुन जातील याची चिंता आहे. यांचा लोकांवर विश्वास नाही की, मृत्यूनंतर कोणी आपल्याला लक्षात ठेवेल की नाही. म्हणून मृत्यूआधी स्टेडिअम आपल्या नावे करुन घेतलं”. असे ट्विट करून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम असलेल्या ‘सरदार पटेल स्टेडिअम’चे बुधवारी ‘नरेंद्र मोदी स्टेडिअम’ असं नामकरण करण्यात आलं. १ लाख ३२ हजार प्रेक्षकसंख्येची क्षमता असणाऱ्या या भव्य स्टेडिअमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते. दरम्यान स्टेडिअमला नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला असून जोरदार टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दल खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिल्याची टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “काय नेता मिळाला आहे देशाला. यांना लोक आपल्याला विसरुन जातील याची चिंता आहे. यांचा लोकांवर विश्वास नाही की, मृत्यूनंतर कोणी आपल्याला लक्षात ठेवेल की नाही. म्हणून मृत्यूआधी स्टेडिअम आपल्या नावे करुन घेतलं”.