मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर थेट आरोप करत पाठपुरावा करत आहेत. आता किरीट सोमय्यांच्या रडारवर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असल्याचं दिसतंय. येत्या शुक्रवारी किरीट सोमय्या पुण्यात जाणार असून हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असणार आहे. हे सरकार 50 वर्षे चालू दे, मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारा माफिया 50 दिवसांत सरळ होणार आहे, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. नुकताच त्यांनी दापोली दौरा केला. अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन ते दापोलीत गेले होते. या दौऱ्यानंतर किरीट सोमय्यांच्या रडारवर कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. त्याचवेळी सोमय्या यांनी आणखी एका मंत्र्याचं थेट नाव घेतलं आहे. पुढील दौरा एप्रिलमध्ये होणार आहे. पण तत्पूर्वी पुण्यात जाणार आहे, असं सांगतानाच त्यांनी थेट हसन मुश्रीफ यांचं नाव घेतलं.
महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यावर सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार ५० वर्षे चालू दे. पण महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारा माफिया ५० दिवसांत सरळ होणार, असा इशारा सोमय्यांनी दिला. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. आता कारवाया आणि न्यायालयीन आदेशाला गती आली आहे. पुढील ५० दिवसांत ‘डर्टी डझन’ एकतर जेल, बेल किंवा रुग्णालयात असतील. महाराष्ट्राला घोटाळामुक्त करणे हे आमचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.