चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर येथे सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची भयंकर घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
५ जानेवारी रोजी लासुर येथील रतिलाल जगन्नाथ माळी (वय ३२) यास मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. चारित्र्याच्या संशयावरून हे कृत्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली होती. याप्रकरणी मयताच्या भाऊ बाबा जगन्नाथ माळी (वय- २८) रा. लासुर याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात मंगेश नवल महाजन, विकास नवल महाजन, भूषण कैलास मगरे, दादू राजेंद्र साळुंखे (सर्व रा. लासूर) या चौघांचा समावेश होता.
पोलिसांनी या प्रकरणी तपास करीत असता, त्यांना या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. यानुसार या खून प्रकरणातील फिर्यादी बाबा जगन्नाथ माळी यानेच आपल्या भावाला मारहाण करून त्याचा खून केला. व बनाव करून इतरांना यात अडकल्याचे निष्पन्न झाले. रतिलाल याने अनेकदा महिलांची छेड काढल्याने समाजात नाव खराब होत असल्याचा राग आबा माळी यांच्या मनात होता. यातूनच त्याने आपल्या भावाचा खून केल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, फिर्यादीच आरोपी बनल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे व उपविभागीय पोलिस अधीक्षक चोपडा राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आराक, पोलीस उपनिरीक्षक अमर विसावे, हवालदार भरत नाईक, राजू महाजन, सुनील जाधव, संदीप धनगर, ईशी पोलीस नाईक विकास सोनवणे, विष्णू भिल, रितेश चौधरी, पोकॉ. सुनील कोळी यांनी या गुन्ह्याची उकल केली.