चाळीसगाव (प्रतिनिधी) भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असणाऱ्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणीबाणीविरोधात संघर्ष करत प्रसंगी कारावास भोगणारे चाळीसगाव तालुक्यातील जेष्ठ सेनानी तसेच व दिवंगत असलेले सेनानी यांच्या कुटुंबीयांचा सत्कार भाजपा चाळीसगाव शहर मंडळातर्फे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात आयोजित या कार्यक्रमात संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करणारे सेनानी स्व. डॉ.वा. ग पूर्णपात्रे यांचे नातू डॉ. सत्यजितजी पूर्णपात्रे (चाळीसगाव), स्व.शिवाजी दत्तात्रय पालवे चाळीसगाव यांचे चिरंजीव प्रशांत शिवाजी पालवे (चाळीसगाव), स्व.जगन्नाथ गोबन राठोड यांचे चिरंजीव मच्छिन्द्रभाऊ राठोड (वलठाण), स्व.सुखलाल मराठे यांचे चिरंजीव यशवंतभाऊ मराठे (चाळीसगाव), रंगराव बालाजी साबळे (करजगाव), दिलीप लक्ष्मणराव गवळी (चाळीसगाव), पंडित रामचंद्र स्वार यांचे नातू सचिन स्वार (चाळीसगाव), स्व. नागो वस्ताद महानुभाव यांची नात श्रीमती सुवर्णा अशोक महानुभाव, चंद्रकांत विश्वनाथ फासे यांचे नातू योगेश फासे, दिनकर देविदास देव यांचे पुतणे मिलिंद देव यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणीबाणीच्या काळात त्यांनी व कुटुंबीयांनी भोगलेल्या यातना, देशावर कोसळलेल संकट, संविधान व नितीमूल्यांची झालेली हत्या याविषयी आपले अनुभव व्यक्त केले. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील संवाद साधत सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली
२५ जून १९७५ – ही ती तारीख आहे, ज्या दिवशी देशावर आणीबाणी लादण्यात आली. आज या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली, पण त्या दिवसाची आठवण अजूनही अंगावर काटा आणते. देशाच्या जनमानसात जे घडलं त्याची जाणीव आजही मनात ताजी आहे.
एका निवडणुकीत पराभव होण्याची भीती आणि लोकशाहीच्या रचनेवर निर्माण झालेलं संकट यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी संविधानाच्या अनुच्छेद ३५२ चा गैरवापर करत आणीबाणी लागू केली.
त्या दिवशी भारतात..
◆ नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले.
◆ माध्यमांवर बंदी आली – वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लागू झाली.
◆ नेते, कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार – हजारोंना गुन्हा नसताना तुरुंगात डांबण्यात आलं.
◆ निवडणुका थांबवण्यात आल्या.
◆ आणि सर्वात मोठं म्हणजे – देशाच्या संविधानाचा गळा दाबण्यात आला.
ज्यांनी या काळात तुरुंगवास भोगला, त्यांचं योगदान अविस्मरणीय आहे. त्यांचं केलेला त्याग केवळ व्यक्तिशः नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या पुनर्जन्मासाठी होतं. त्यांनी झुकणं नाकारलं आणि एक आशेचा दीप तेव्हाही जिवंत ठेवला.
या महान कार्यकर्त्यांमध्ये जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मोरारजी देसाई, नानाजी देशमुख, आणि कित्येक पत्रकार – हे सारे लोक एकच संदेश देत होते – “लोकशाही वाचवा.”
त्यांनी दिलेला तो लढा १९७७ मध्ये फळाला आला. जनता उठली. इतिहासात प्रथमच काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर फेकला गेला. लोकांनी तानाशाही काँग्रेस नाकारली आणि लोकशाहीला पुन्हा उभं केलं.
काँग्रेस पक्षाने जो तो काळ गडद केला, तो काळ आज विसरणं हा लोकशाहीच्या मूळ तत्वांशी गद्दारी ठरेल आणि म्हणूनच आम्ही या दिवसाला ‘संविधान हत्या दिवस’ म्हणतो.
ही केवळ ऐतिहासिक आठवण नाही, तर लोकशाहीची किंमत काय असते, याची सततची आठवण आहे. आज आपलं सरकार – पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली – लोकशाहीच्या रक्षणासाठी पूर्ण कटिबद्ध आहे.
प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमांना मुक्तता आणि नागरिकांना मतदानाचा हक्क – या गोष्टी अजोड महत्त्वाच्या आहेत. लोकशाही मूल्यांचं संवर्धन हे फक्त सरकारचं काम नाही – ते आपल्या सर्वांचं जबाबदारी आहे.
हा कार्यक्रम केवळ स्मरणरंजनासाठी नाही. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना जागं ठेवण्यासाठी आहे.
आज आपण संविधान, लोकशाही आणि स्वातंत्र्य या संकल्पनांचा उपभोग घेतो – पण या गोष्टी सहज मिळालेल्या नाहीत. त्या मिळवण्यासाठी कोणीतरी तुरुंगात सडला आहे, कोणीतरी संप झाल्यानंतर घर सोडलं आहे, कोणीतरी आवाज उठवून मार खाल्ला आहे.
● आजचा दिवस आपल्याला हे शिकवतो की, जेव्हा सत्तेचा गैरवापर होतो, तेव्हा लोकांनीच आवाज उठवला पाहिजे. कारण लोकशाही ही सरकारची कृपा नाही, ती आपली एक सामूहिक जबाबदारी आहे.
चला, आपण सर्वजण आज ‘संविधान हत्या दिना’च्या निमित्ताने ही शपथ घेऊ –
● लोकशाहीचं रक्षण करायचं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपायचं. आणि या देशाच्या संविधानाला सदैव माथ्यावर ठेवायचं.