जळगाव (प्रतिनिधी) भुलाबाई विसर्जनासाठी तलावात उतरलेले एकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. रमेश भिका चव्हाण (वय ४१, रा. वसंतवाडी), असे मयताचे नाव आहे. तब्बल २२ तासांनंतर जलतरणपटूंच्या मदतीने सुरू असलेल्या शोधकार्यात एनडीआरएफच्या पथकास अखेर मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास यश आले होते.
काही भुलाबाईंचे विसर्जन झाल्यानंतर पाण्यात बुडाला !
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथी रमेश भिका चव्हाण एका खासगी कंपनीत हमाली काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. सोमवारी गावातील काही मुली भुलाबाई विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या असताना त्या ठिकाणी रमेश चव्हाण काठावरून भुलाबाई घेऊन पाण्यात नेत होते. काही भुलाबाईंचे विसर्जन झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास चव्हाण हे पाण्यात बुडाले. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता.
आपत्ती व्यवस्थापन पथकाच्याने तलावामध्ये बोट व गळाच्या सहाय्याने घेतला शोध !
मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून आपत्ती व्यवस्थापन पथकाच्याने तलावामध्ये बोट व गळाच्या सहाय्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास पट्टीच्या पोहणाऱ्यांनी चव्हाण यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढल्यानंतर तत्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत चव्हाण यांना मयत घोषीत केले. रमेश चव्हाण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुल, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ विकास सातदिवे हे करीत आहेत.
२२ तासानंतर सापडला मृतदेह !
आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने संपूर्ण तलावात बोटीच्या सहाय्याने रमेश चव्हाण यांचा शोध घेतला. मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांना मृतदेह मिळून आला नाही. अखेर मुक्ताईनगर येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलविण्यात आले. त्यांनी अडीच वाजता तलावात उडी घेतली. त्यानंतर सव्वातीन वाजता चव्हाण यांचा शोध लागल्यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी रमेश चव्हाण यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.